● पुस्तक - कृष्णाकांठ ● लेखक – यशवंतराव चव्हाण ● साहित्यप्रकार - आत्मचरित्र ● पृष्ठसंख्या – ३१६ ● प्रकाशक – रोहन प्रकाशन ● आवृत्ती - ०९ वी । प्रथम आवृत्ती - १९८४ ● समीक्षक - विक्रम चौधरी
कराड.. कृष्णा व कोयना या दोन भगिनी जेथे एकमेकींना घट्ट मिठी मारतात व पूर्वेकडे एकरूप होऊन प्रवाहित होतात असे स्थळ.. कराड शहराचं नाव ऐकताच सर्वप्रथम आपल्याला आठवतो तो प्रीतिसंगम.. हा प्रीतिसंगम सतत साक्ष देतो त्या कृष्णकाठावर ज्यांची शैक्षणिक, वैचारिक व सांस्कृतिक जडणघडण झाली अश्या यशवंतराव चव्हाण यांच्या गौरवशाली प्रवासाची..
आपल्या आयुष्यातील १९१२ ते स्वातंत्र्योत्तर कालखंडाचा आढावा घेणाऱ्या दोन खंडाच्या आत्मचरित्राचे लिखाण करण्याचा यशवंतराव चव्हाण यांचा मानस होता. यातील पहिला खंड म्हणजे कृष्णाकाठ..!!
सातारा जिल्ह्याच्या टोकावर डोंगराच्या कुशीत वसलेलं देवराष्ट्र हे एक लहानसं गाव.. याच गावामध्ये यशवंतरावांचा अंकुर अवतरला.. इथल्या हळव्या व रम्य आठवणींनी आत्मचरित्राची सुरुवात होते. वैयक्तिक, राजकीय व सामाजिक आयुष्यात यशवंतराव कसे घडत गेले याचा पूर्ण आढावा या पुस्तकात आलेला आहे. अगदी शालेय जीवनात त्यांना वाचनाची गोडी लागली तसेच सामाजिक कर्तव्याबद्दल जाणिवा त्यांच्या मनात घर करू लागल्या. जतींद्रनाथ दास यांनी जामिनावर सुटका करून न घेता तुरुंगात स्वीकारलेला मृत्यु या एका घटनेने यशवंतरावांची राजकीय मनोभूमी तयार करण्यात मोलाची भूमिका बजावली.. राजकारणासोबत समाजकारण हा यशवंतरावांच्या व्यक्तिमत्वाचा एक अविभाज्य भाग बनला तो अश्या अनेक लोकचळवळींनी त्यांना दिलेल्या प्रेरणेतून..
या आत्मचरित्राची मांडणी तीन प्रकरणामध्ये केलेली आहे. जडणघडण, वैचारिक आंदोलन आणि निवड अशी ही प्रकरणे.. प्रत्येक प्रकरणात त्यांच्या आयुष्याच्या कलाटणी देणाऱ्या व्यक्ती, विचार, सामाजिक परिस्थिती व मनातील स्थितांतरे यांचे वर्णन यशवंतरावांनी कैक किस्से सांगून केलेलं आहे. सावरकरांशी त्यांच्या झालेल्या भेटीबद्दल सांगताना ते म्हणतात ; “सागर आणि सावरकर एकाच वेळी पाहण्याचे भाग्य लाभल्यामुळे रत्नागिरीची माझी आठवण ह्या भेटीशी कायम संलग्न झालेली आहे..”
पुस्तकाच्या शेवटी व्यक्ती, स्थळ, प्रसंग व विषय अश्या घटकांची सूची दिलेली आहे जी वेगवेगळे संदर्भ शोधण्यास खूप उपयुक्त आहे.
संयुक्त महाराष्ट्र राज्याचे पाहिले मुख्यमंत्री, देशाचे गृहमंत्री, उपपंतप्रधान व सरंक्षण मंत्री अशी अत्यंत महत्वाची पदे भूषावणारे यशवंतराव चव्हाण यांच्या जीवनाचा १९४६ पर्यंतचा प्रवास या खंडात संपतो.. देश स्वतंत्र झाल्यानंतर बहरणाऱ्या राजकीय करकीर्दीसोबतच अनेक वैयक्तिक व राजकीय वादळेही त्यांच्या जीवनात आले. १९५० नंतरचा यशवंतरावांचा जीवनपट या आत्मचरित्राच्या दुसरा खंड - सागरतीर मध्ये उलगडणार होता. पण सागरतीर चे लिखाण त्यांच्या हयातीत पूर्ण झाले नाही आणि महाराष्ट्रच्या पायभरणीच्या काळाशी आपल्याला जोडण्याऱ्या एका दुव्यापासून आपण वंचित राहिलो ही खंत मनाला लागून राहते.
यशवंतरावांची मराठी मातीशी घट्ट असलेली नाळ, सर्व घटकांशी असलेली बांधिलकी, सर्वसमावेशक विचार, तत्ववाद आणि त्यांनी केलेला अविरत संघर्ष याचा आलेख नक्कीच सर्वांनी वाचायला हवा..!!
यशवंतरावांच्या जीवनाचा हा आलेख नक्कीच सर्वांनी वाचायला हवा..!!
माननीय शरद पवारांचे राजकीय गुरु आणि महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री एवढाच काय तो माझ्या पिढीला यशवन्तराव चव्हाणांचा परिचय. या पुस्तकाच्या निमित्ताने एका सामान्य कुटुंबात जन्मलेले यशवन्तराव आणि त्यांचा संघर्षमय प्रवास ते कथित करतात. त्यांचे विचार, तत्वनिष्ठता , समाजातील विविध घटकांशी असलेली त्यांची बांधिलकी आणि त्यांनी केलेला अविरत संघर्ष याची कहाणी तरुण पिढीला आणि आजच्या राजकारण्यांना मार्गदर्शन करेल यात अजिबात शन्का नाही .
Well written autobiography.. The part I loved the most is Yashvatrao's 1st visit to meet V. D. Savarkar. This is the story of ordinary boy with extraordinary will power to do something only for India.