ललित लेख असलेले हे पुस्तक ज्येष्ठ चित्रकार चंद्रमोहन कुलकर्णी यांनी लिहिले आहे. चित्रकाराचा चित्रात जिवंतपणा आणावयाचा गुण व खोल निरीक्षण त्यांच्या ह्या लेखांमध्ये पण दिसून येतात. लेखकास आयुष्यभरात जी लोकं भेटली, ज्यांच्याशी त्यांचे व्यवहार झाले अश्या लोकांची व्यक्तिचित्रणं त्यांनी ह्या पुस्तकात केली आहेत. कॉलेज पासून नंतर मोठे चित्रकार होईपर्यंत त्यांना जी लोक भावली त्यांच्याबद्दल ह्यामध्ये लिहिले गेले आहे. मग त्यात त्यांचे वडील आहेत, शिक्षक आहेत, मित्र आहेत, अगदी पु.ल व कवी ग्रेस अशी थोर व्यक्तिमत्त्वं पण आहेत. एखादा माणूस समोर बसून किस्से सांगतो तसेच हे पुस्तक वाटते. व्यक्तिचित्रणं असली तरीपण, प्रत्येक गोष्टीला स्वतःचा असा वेगळेपणा आहेच तरीही त्या सर्व गोष्टींत एक मिश्कीलपणा पण आहे. परत लेख वाचताना आर्ट स्कुल कसे असते हे तर कळतेच व पुण्याची सफर होते ती वेगळीच. आयुष्यात आपल्यालाही बरीच आगळीवेगळी लोकं भेटत असतात पण त्यांना तसेच कागदावर उतरवणे म्हणजे एक कौशल्यच असते व ते लेखकास अगदी नीट जमले आहे. निळी सायकल, जिलेबी, मटका, कौमार्यभंग आणि स्वीकार व नकार हे मला सर्वांत जास्त आवडलेले लेख.