#bookreview
#mybookshelfof2026
पुस्तक-गुलमोहर
पुस्तक प्रकार-कथासंग्रह
लेखक-व.पु.काळे
प्रकाशन-मेहता पब्लिशिंग हाऊस
मूल्य-१३०₹
पृष्ठ संख्या-१२७
"माणसांच्या गर्दीत 'माणूस' शोधणारा लेखक" अशी ओळख असणाऱ्या व.पु.काळेंचं लिखाण म्हणजे वाचकांसाठी कायमच एक पर्वणी असते.'गुलमोहर' हा याच पर्वणीचा एक भाग.लोकविलक्षण माणसांच्या चाकोरी बाहेरील कथांचा संग्रह म्हणजे 'गुलमोहर'.
गुलमोहराचं झाड जसं निळ्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर डुलणारं व काळ्या ढगातही तितकंच वैभवशाली बहरलेलं दिसतं,अगदी तसंच या संग्रहातील १३ कथा मनावर प्रभाव पाडतात.या कथा मानवी मनाच्या कोपऱ्यात दडलेल्या न सांगितलेल्या भावना,नात्यांमधली गुंतागुंत,हलकासा विनोद,मनाला अंतर्मुख करणारे विचार व आयुष्याकडे पाहण्याचा एक हळुवार दृष्टिकोन यांचा जणू सडाच घालतात.यातील कथा छोट्या क्षणांमधलं मोठेपणं अगदी नेमकं पकडतात व म्हणूनच प्रत्येक कथा वाचकाला थांबवून विचार करायला भाग पाडते.
संग्रहातील प्रत्येक कथा जीवनाचा एक नवा पैलू उलगडते.'गुलमोहर' कथेत दिवाकरपंतांचा समंजसपणा दिसतो,तर 'गांधारी' नियतीने दिलेल्या माणसांना स्वीकारण्याची जाणीव करून देते.'एकटा' मधील विशा उपासमार व पश्चात्तापाचा असा ठसा उमटवतो की तो वाचल्यानंतर वाचकही सुन्न होतो.'भरती' ही कथा लग्नानंतरच्या सच्च्या प्रेमावर विश्वास निर्माण करते,तर 'नजर' मधील आबांचा त्याग सांगतो की पाहणे म्हणजे केवळ डोळ्यांनी नव्हे तर मनाने पाहणे होय.
नात्यांच्या गुंतागुंतीवर भाष्य करताना 'दहावा ग्रह' लग्नसंस्थेवर अस्वस्थ प्रश्न उभा करते. 'सर' व 'अढळपद' या कथा स्त्री-पुरुष नात्यांतील सूक्ष्म पदर समोर आणतात.'मुक्तछंदा' मधील संयम व 'शिळा' मधील अहिल्येची समाजमान्यतेच्या चौकटीतून झालेली मुक्ती मनाला भिडते.तर 'पुरुष' ही कथा समाजातील विकृत मानसिकतेची जाणीव करून देते.
या कथांमधील व्यक्तिरेखा या वरवर पाहता आपल्याला 'विक्षिप्त' वाटू शकतात पण खोलवर विचार केल्यावर जाणवतं की,ही माणसं स्वतःच्या तत्त्वांवर ठाम असणारी,स्वतःच्या सिद्धांतांना चिकटून राहणारी आहेत. त्यांचे विचारसरणी जगाला न पटणारी असली तरी ती पूर्णतः प्रामाणिक आहे.
या पुस्तकाची सर्वात जमेची बाजू म्हणजे वपुंची सहज सुंदर लेखनशैली.मानवी भावभावनांचा स्पेक्ट्रम वपूंच्या लेखणीतूनच सप्तरंगात उधळला जातो असं मला वाटतं.वपु कधीच उपदेश करत नाहीत ते फक्त आयुष्य जसं आहे तसं समोर ठेवतात.म्हणूनच,कोणतीही कृत्रिम नाट्यमयता नसतानाही प्रत्येक कथा मनाचा ठाव घेते.
असं हे आजच्या धकाधकीच्या जीवनात थोडं थांबून मानवी मनाचा प्रवास समजून सांगणारं पुस्तक आपण सर्वांनीही वाचावे.
.
.
.
-©® गायत्री😇