ही वास्तविक शंकरराव खरात यांच्या जीवनाची कथा आहे. पण त्याच बरोबर ती एक ‘स्टोरी ऑफ द अनटचेबल’ आहे. त्यांच्या बरोबर त्यांच्या समाजाची कथा आहे. एका वक्तीच्या, एका समाजाच्या, एका गावाच्या मानसिक, सामाजिक, वैचारिक जीवनात घडत आलेल्या, चाललेल्या विकासाची ही कथा आहे. सर्व थरातील रसिक, वाचक, समीक्षक, साहितिक, विचारवंत व समाजशास्त्रज्ञ यांनी मन:पूर्वक स्वागत केलेल्या या पुरस्कारविजेत्या आत्मकथेचे हिंदीतही भाषांतर झाले आहे.
शंकरराव खरात (जुलै ११, १९२१ - एप्रिल ९, २००१) हे मराठी लेखक, कादंबरीकार होते. ते मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरूही होते. शंकरराव खरात हे यांचा जन्म आटपाडी येथे झाला. `तराळ-अंतराळ' हे त्यांचे आत्मचरित्र गाजले. `मी स्वत: महात्मा फुले, शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा शिष्य आहे` असे ते नेहमी म्हणत.
इ.स. १९५७ साली त्यांची नवयुग दिवाळी अंकात, वयाच्या पस्तीसाव्या वर्षी `सत्तूची पडीक जमीन ` नावाची पहिली कथा प्रकाशित झाली. त्यांनतर रामा महार, बंडा मांग अशा बलुतेदारांच्या बारा कथा त्यांनी नवयुगमध्येच लिहिल्या.
इ.स. १९५७-५८ मध्ये शंकरराव खरातांची `माणुसकीची हाक' ही महार बलुतेदारावर लिहिलेली कादंबरी गाजली. त्यामुळे ते पुढे लेखक म्हणून उदयाला आले. साहित्याच्या ओढीने त्यांनी राजकारणही सोडले.
खरात यांचा जन्म ११ जुलै १९२१ ला सांगली जिल्ह्यातील आटपाडी इथे झाला. तिथल्या महारवाड्यात त्यांचं बालपण गेलं. समाजाने अस्पृश्य ठरवल्यानंतर वाट्याला येणारं दु:ख काय व कसं असतं याचा पदोपदी आलेला आणि हृदय पिळवटून टाकणारा अनुभव त्यांनी घेतला. त्यासाठी शिक्षणाने त्यांना साथ दिली. शिक्षणाने नवा विचार त्यांच्या मनात रुजवला आणि तो फुलवत ठेवला. याच काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली धर्मांतराची हाक दलितांमध्ये विचार पेरणारी आणि प्रभाव पाडणारी होती. बंड करण्याचं, दारिद्रय झुगारण्याचं, शोषणाला ढकलण्याचं आणि अवहेलनेला पायाखाली घेण्याचं- ही सर्व तंत्रं काही प्रमाणात खरातांची पात्रं अवलंबतात, पण त्यात उद्ध्वस्त करण्याची भाषा नाही. बारा बलुतेदार (१९५९), तडीपार (१९६१), सांगावा (१९६२), टिटवीचा फेरा (१९६३), सुटका (१९६४), दौण्डी (१९६५), आडगावचे पाणी आणि गावशीव (१९७०) हे कथासंग्रह खरात यांच्या नावावर आहेत. हातभट्टी (१९७०), गावचा टिनोपाल गुरुजी (१९७१), झोपडपट्टी (१९७३), मसालेदार गेस्ट हाऊस (१९७४), फुटपाथ नं. १ (१९८०), माझं नाव (१९८७) या कादंब-या शंकरराव खरात यांनी लिहिल्या. १९८१ मध्ये त्यांनी लिहिलेलं ‘तराळ-अंतराळ’ हे आत्मचरित्र मराठी साहित्यविश्वातील एक श्रेष्ठ कलाकृती म्हणून गणलं गेलं.
याशिवाय डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सहवासात (१९६१), डॉ. आंबेडकरांचे धर्मांतर (१९६६), डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची आत्मकथा (१९९०) ही त्यांची पुस्तकंही उल्लेखनीय ठरली.
१९८४ ला जळगाव इथे भरलेल्या ९८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपदही त्यांनी भूषवलं. याशिवाय अनेक मानाच्या पुरस्कारांचे, सोहळ्यांचे ते सन्माननीय धनी ठरले. ९ एप्रिल २००१ला वयाच्या ऐंशीव्या वर्षी त्यांचं निधन झालं.