इतिहासातील ज्या कालखंडाला 'शिवशाही’ म्हणून संबोधले जाते तो काळ, शहाजीराजांनी स्वराज्यासाठी जे प्रयत्न केले, त्या काळापासून सुरू होतो आणि इ. स. १७०७ मध्ये औरंगजेबाच्या मृत्यूपाशी तो संपतो.
संबंध शिवशाहीवर जबरदस्त ठसा जर कोणाचा उमटला असेल तर तो शिवाजी महाराजांचा. 'श्रींचे हिंदवी राज्य’ ही त्यांची राष्ट्रनिष्ठ संकलपना, त्यांच्या काळाला त्यांनी दिलेली एक फार मोठी देणगी होती या कालखंडावर वसंत कानेटकरांनी, इथे ओशाळला मृत्यू, तुझा तू वाढवी राजा, रायगडाला जेंव्हा जाग येते अशी प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणारी नाटके लिहिली. उच्च नाट्यमूल्ये, रक्त तापवणारी ऐतिहासिक मूल्ये, आणि प्रभावी संवादरचना यांनी ही नाटके अजरामर ठरली.
याच मालेतील या नाटकात इ. स. १६८९ ते १७०७ एवढ्या प्रदीर्घ कालखंड मांडला आहे. वेगाने घडणार्या अत्यंत आशयपूर्ण भरगच्च घडामोडी, विविध प्रवृत्तींची माणसे, आणि त्यांच्यात गुंतलेले पिळदार सामाजिक संदर्भ यातून केलेली नेमक्या आशयासह टोकदार नाट्यनिर्मिती हे या नाट्यकृतींचे खास वैशिष्ट्य.
संभाजीवधानंतरच्या मराठ्यांचा इतिहास, त्यातील राजाराम, शाहू, ताराबाई, संताजी, धनाजी या व्यक्तिरेखा त्यांचे गुण-दोष, थोरवी-क्षुद्रता यामुळे घडलेल्या घडामोडी असा मोठा पट या नाटकात उलगडला जातो.