४०० वर्षांपूर्वी निळावंती सह्याद्रीच्या जंगलात राहायची. बाजिंद्याने स्वतःच्या फायद्यासाठी निळावंतीशी लग्न केलं. तिच्याकडून पशुपक्ष्यांची भाषा शिकून घेतली. स्वार्थासाठी तिचा वापर करून घेऊन नंतर तिचा खून केला. सह्याद्रीच्या खोऱ्यात बाजिंदा आणि निळावंतीची प्रेमकथा अजूनही चवीने सांगितली जाते. ह्या निळावंतीची पोथी कुप्रसिद्ध आहे. जो वाचतो त्याला एक तर वेड तरी लागतं किंवा त्याचा मृत्यू तरी होतो.
अलीकडच्या काळात, १९९२साली घडलेली एक अजब घटना. एक बाप निळावंतीची पोथी शोधत सह्याद्रीच्या जंगलात येतो. त्याच्यासोबत आहे त्याच्या मुलाचा बर्फात अन मिठात ठेवलेला मृतदेह. ह्या जतन केलेल्या मृतदेहाला जिवंत करण्यासाठी बाप जंगजंग पछाडतो. शेवटी त्याला अनपेक्षितरित्या जंगलात साक्षात निळावंतीचं अस्तित्व सापडतं. बाप आपल्या मुलाच्या मृतदेहाला जिवंत करू शकतो का? वनदेवता निळावंती अजूनही अस्तित्वात आहे का? तिची भाषा म्हणजे कोणती भाषा? निळावंती जर आजही अस्तित्वात असेल तर चारशे वर्षांपूर्वी ती मेली नव्हती का? बाजिंद्याने निळावंतीचा खून केला नव्हता का? तिचा खून कोणी केला होता? खून होऊनही निळावंती जिवंत कशी राहिली? ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आहेत, ‘महामाया निळावंती’त.
अठरा पौराणिक पोथ्या, अनेक ऐतिहासिक दस्तऐवज, तांत्रिक आख्यायिका व निळावंतीच्या दंतकथांचा अभ्यास करून लेखक सुमेध ह्यांनी निर्माण केलेली ही अद्भुत, जादुई, थरारक व मेंदूसोबत खेळणारी मेटाफिक्शन कादंबरी.
अत्यंत दर्जेदार.. सुमेधचं करावं तेवढं कौतुक कमी. वाचता वाचता आपण अचानक कथेचा एक भाग आहोत असं वाटून जातं इतकी छान शैली आहे. आणि कथा तर त्याहून छान. असंच अजून खूप काही सुमेध कडून वाचायला मिळत रहावं..
महामाया निळावंती - सुमेध इंगळे पुस्तक परीक्षण/ Book Review - ओंकार बागल
प्रकाशन - न्यू एरा पब्लिशिंग हाऊस, पुणे पृष्ठ संख्या - ३७० पाने
निळावंती, निळावंती ग्रंथ, निळावंती पोथी याबद्दल बऱ्याच लोकांना उत्सुकता होती, आहे आणि ती नेहमीच राहील. ९० च्या शतकात बंदी घालण्यात आलेला हा ग्रंथ अजूनपर्यंत अनेकांच्या मनात कुठेतरी दडून बसलेला आहे. बंदी असूनही आतापर्यंत कित्येकांनी त्यांच्याकडे या ग्रंथाची खरी प्रत वा पोथी असल्याचा दावा केला आहे. निळावंती म्हणजे पशुपक्ष्यांशी भाषा शिकवणारा ग्रंथ अशी एक आख्यायिका आहे. हा ग्रंथ वाचून आपण पशुपक्ष्यांची बोलू शकतो, संवाद साधू शकतो. निसर्गाच्या भाषेत बोलू शकतो. लोक असं म्हणतात की एकदा का निळावंती हा ग्रंथ वाचला की माणूस एकतर वेडा होतो किंवा आत्महत्या करतो. निळावंतीच्या नादाला लागून बरेच घरसंसार मोडले, अशाही घटना आहेत. खोट्या तांत्रिक अन् फसव्या भोंदू बाबांनी याचा गैरफायदा घेऊन बरेच अनैतिक, चुकीचे आणि गुन्हेगारी प्रवृत्तीचे मार्ग अवलंबिले. त्यामुळे सरकारने निळावंती ग्रंथाच्या सर्व पोथी जाळून टाकल्या आणि त्यावर बंदी आणली असं बऱ्याच जणांचं मत आहे.
तरुण लेखक सुमेध इंगळे यांनी त्यांच्या कादंबरीसाठी हा गूढ, अनाकलनीय आणि अकल्पित विषय घेतला हीच मुळात अचंबित करणारी गोष्ट. कारण हा विषय हाताळण्यासाठी करावं लागणारं दीर्घसंशोधन, पुरावे, सिद्धता, सत्यता पडताळण्यासाठी लागणारे महत्वाचे दस्तऐवज, आख्यायिका, दंतकथा, टिपण्या, मोडीलिपीतील लिखाण ही अतिशय अवघड किंवा गुंतागुंतीची प्रक्रिया. लोकांनी सांगितलेल्या मोडक्या-तोडक्या कथा, कहाण्या, त्यांना एकमेकांशी जोडून, सांधून त्यातून काही धागेदोरे मिळतात का पाहणे आणि त्याची उकल करणे काही साधे सोपे काम नव्हे. शिवाय या विषयावर इतका खटाटोप करूनही वाचकाला विश्वासात घेण्यासाठी एका वेगळ्या उंचीचं, साजेसं लिखाण करणं गरजेचं होतं. या सगळ्याची दक्षता घेऊन लेखक सुमेध यांनी अतिशय काळजीपूर्वक या कादंबरीचे लेखन हाताळले आहे.
लेखक सुमेध यांनी या कादंबरीसाठी १९९२ साली घडलेल्या एका विचित्र घटनेचा मागोवा घेतला आहे. एक बाप बंगरुळहून त्याच्या मृत मुलाला जिवंत करण्यासाठी निळावंतीची पोथी शोधत सह्याद्रीच्या जंगलात येतो. निळावंती पोथीद्वारे मेलेल्या माणसाला जिवंत करता येते या एका भाबड्या आशेवर. बर्फाच्या पेटीतील मृत शरीर आणि सोबत लहानगी मुलगी असा या कादंबरीचा प्रवास चालू होतो. मुलाला जिवंत करण्यासाठी कोणत्या कोणत्या चित्रविचित्र घटना घडतात? त्यासाठी काय काय मार्ग अवलंबिले जातात? हे सगळं खरंच शक्य आहे काय? मेलेला माणूस जिवंत करता येतो का? माणसंचं की इतर पशू प्राणीदेखील जिवंत करता येऊ शकतात? माणूस निसर्गाशी त्याच्या भाषेत सवांद साधू शकतो का? की या सर्व निराधार, भेकड कथा आहेत? निळावंती नेमकी कोण? तिचं अस्तित्व काय? देवता की महामाया की आणखी दुसरंचं काही? त्या माणसाला खरोखर निळावंती भेटते का? ग्रंथ साध्य होतो का? मग नेमकं पुढे काय होतं? या सर्व प्रश्नांची उत्तरे या कादंबरीत आहेत.
आता या कादंबरीच्या मुळाशी जाऊयात. अंधकारासमान काळ आणि उल्कासारखी माया या दोन्ही विरुद्ध स्वभावांचे पृथ्वीच्या जन्मापासून चालू असलेलं द्वंद. पृथ्वीच्या शेवटापर्यंत सर्व जिवंत राहावे यासाठी अट्टहास धरणारा काळ, जन्ममृत्यूचे चक्र, मायेचा खून करण्यासाठी तिच्यामागे धावणारा काळ, काळापासून जीव वाचण्यासाठी कित्येक जीवांत चेतना बनून शिरणारी महामाया. महामायेने पृथ्वीवर जीवनचैतन्य पसरवण्यासाठी हजारो अवतार घेतले आणि तिला मारण्यासाठी महाकाळाने त्याचवेळी कित्येक पुरुषी हेरुक बनवून तिला संपवण्याचा प्रयत्न केला. मृत्यूचा मृत्यू करण्यासाठी, सर्व जन्म कायमचे अमर्त्य ठेवण्यासाठी, स्वतःच्या महत्त्वाकांक्षी धारणेसाठी. निळावंतीचा मृत्यू म्हणजे कलियुगाचा शेवट आणि मृत्यूचाही मृत्यू करून बननारा ब्रह्मांडाचा नायक ही खरी त्यामागची धारणा.
मृत्यूवर विजय मिळवण्याची महत्त्वाकांक्षी धारणा आणि मृत्यू सुंदर आहे, मृत्यूचा स्वीकार केला पाहिजे हे त्रिकालबाधित सत्य या दोन्हींचे द्वंद खरं तर या कादंबरीचे मर्मस्थान आहे. त्यामुळे वाचताना कादंबरीच्या प्रत्येक प्रवाहात बुद्धीचा कस लागतो. ही कहाणी, त्यातील पात्र, घटना या फक्त निम्मित मात्र आहेत. लेखकाने कादंबरीत त्या फक्त प्रकाशमय चंद्राकडे बोट दाखवावे अशारीतीने वापरल्या आहेत. वाचकाने कथेपेक्षा त्यातील ज्ञानार्जनावर भर द्यावा असे मत त्यांनी व्यक्त केले आहे, जे बहुतांशी रास्तदेखील आहे. हा सगळा घाट घालण्याचा हेतू वाचकांना कळावा, त्यातून योग्य तो बोध घेता यावा इतक्या साध्या, सरळ आणि रंजक भाषेत लिहिलेली ही कादंबरी. कादंबरीतील एक एक पात्र अगदी वेचून घेतल्यासारखी आहेत. विभुतेसारखा बाप, चिमुकली नलू, पीएचडी असलेला तांत्रिक घैसासगुरुजी, पाण्यातला पूज्य, चौसष्ट समंधाचा राजा कालसमंध, चारशे वर्षांचा इतिहास असलेला बाजिंदा, निळ्या केसांची माणसं, यादव आणि सेंबियन, देवसरीचा रायरीकर आणि स्वीडनचा हेलबर्ग.
कादंबरीची आणखी एक खासियत म्हणजे पूर्वार्धात घडलेल्या घटनांची आणि भविष्यात उद्भवू पाहणाऱ्या शक्यतांची अथवा भविष्यदर्शनाची घातलेली योग्य सांगड. मग ती निळावंतीची गोष्ट असो, निळ्या डाकीणीची, सह्याद्रीच्या जंगलाची, बजिंद्याची, इतर पात्रांची वा भूतकाळातील एखाद्या गोष्टीची. लेखकाने ही कथा कुठेही बोथट होऊ नये याची पुरेपूर दक्षता घेतली आहे. कादंबरीचा विषय केवळ निळावंतीची आख्यायिका सांगणारी कहाणी आहे; मात्र त्यायोगे लेखकाने मानवाबद्दल, निसर्गाबद्दल, मानवी अंतर्मन, चेतना अशा कित्येक गोष्टींचे सखोल चिंतन केले आहे. शिवाय कहाणीत कुठेही भोंदूगिरी, फसवेगिरी, तंत्रमंत्र, कर्मकांड या गोष्टींना दुजोरा देण्याचा प्रयत्न केला गेलेला नाही. अघोरी विद्या, चमत्कार, दैवी साक्षात्कार यांना काही प्रमाणात पॅरेलल युनिव्हर्स, जेनेटिक म्युटेशन, लाईफसायकल अशा वैज्ञानिक चौकटीतून पाहण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला आहे.
"माणसाच्या बाहेर जेवढं मोठं जग असतं, माणसाच्या आत तेवढंच मोठं जग असतं. बाहेरचं जग जेवढं खरं, आतलं जगही तेवढंच खरं." पुस्तक वाचताना वाचकाला या गोष्टीची वारंवार जाणीव होत राहते. निळावंती या पात्राच्या साहाय्याने विभुते आणि हेलबर्गच्या चेतनेला जागृत करून लेखकाने त्यांच्या अंतर्मनातील जे ब्रह्मांड दाखवले ते अक्षरशः सुरेख आहे. या आख्यायिकेच्या आधारे आणखी खूप सुंदर गोष्टी कादंबरीत वाचायला मिळतात. जसे की नेमका पुनर्जन्म कशाला म्हणावा? जल आणि अग्नीच नातं, मानव आणि निसर्गाचं नातं, जंगलाचा जिवंतपणा, निसर्गाचं वरदान, मुक्या प्राण्यांची वेदना, माणसाचं आतलं जग, विश्वचक्र, नियती आणि नियमन, देवता ही संकल्पना. याशिवाय मानवाचा खोटेपणा, आततायीपणा, धूर्तपणा, स्वार्थीपणा, निर्दयीपणा, दांभिकपणा, हिंस्त्रपण�� अशा एक एक वरचढ खल प्रवृत्ती कादंबरीत चितारल्या आहेत.
अठरा पौराणिक पोथ्या, लोकांकडून ऐकलेल्या निळावंतीच्या दंतकथा, विविध ऐतिहासिक दस्तऐवज आणि तांत्रिक आख्यायिका यांचा अभ्यास करून लेखक सुमेध इंगळे यांनी लिहिलेली ही अद्भुत, थरारक व मनोबुद्धिशी द्वंद करणारी मेटाफिक्शन कादंबरी वाचकाला नक्कीच एक विलक्षण चेतना देऊन जाणार याची खात्री आहे.
"Good. It is the story of Nilavanti, the fictional character who is worshipped by the people of the Sahyadri Mountains. The story revolves around her and Bajinda. Bajinda is the character who killed Nilavanti out of love.
To find out why, who, when, and where, read this book. It's a Marathi book, very neatly written by the author Sumedh. I discovered this book after listening to Sumedh's "Ajaatshatru" on the Storytell app. I became a superfan after listening to that amazing book. I urge everyone to listen to it."
जर या कादंबरी कडे फक्त काल्पनिक म्हणून पाहिले तर गोष्ट एकदम छान आहे. खूप छान कल्पना सुमेध ने यामध्ये मांडली आहे. पण जसे यात लेखक म्हटला की ही कथा सत्य घटनेवर लीहली आहे तर बरेच प्रश्न यामध्ये उभे राहतात. ज्याची उत्तरे लेखकाने दिली तर खूपच छान होईन. Please let me know if I can have a one to one conversation with sumedh. Will be waiting for rever.
Interesting use of metaphors to bring out the relationship between humanity and nature, does drag a bit in between but does justice to it's premise. And no you should not read sitting next to a pyre of a pregnant woman.