ही आहे एका शिंप्याच्या पराभवाची, दुःखाची कहाणी. एका मोठ्या गावात शिंप्याचा धंदा करून पोटापुरती कमाई करणारा विठू हा या कथेचा नायक आहे. शहरात आधीच लोकप्रिय असलेले रेडिमेड कपडे आता खेड्यांतही लोकप्रिय होऊ लागतात आणि त्याचा शिंपी धंद्यावर विपरित परिणाम होऊ लागतो. वस्त्रांबद्दलच्या लोकांच्या अभिरुचीत झालेल्या बदलामुळे विठूचा धंदा बसू लागतो आणि आधीच दारिद्र्यात दिवस काढणाऱ्या विठूचे कुटुंब शेवटी उपासमारीच्या खाईत लोटले जाते. जेव्हा जेव्हा लोकांच्या जीवनपद्धतीत लहानमोठे बदल होतात, तेव्हा तेव्हा काही प्रस्थापित व्यवसाय आणि सामाजिक संस्था कालबाह्य होऊन नष्ट होऊन जातात. त्यांच्याशी निगडित असणाऱ्या व्यक्तीही समाजात नगण्य आणि उपऱ्या होऊन जातात. या परिवर्तनकाळात काही अनामिकांचे जीवन सर्वांगाने उद्ध्वस्त होऊन जाते. ही समाजात सातत्याने घडत असलेली प्रक्रिया आहे. अशा एका सनातन आशयसूत्रातून या कादंबरीची निर्मिती झाली आहे. याबरोबरच एक गाव, तिथले विस्कळीत होऊन अराजकाच्या, अमानवीकरणाच्या सीमेवर पोहोचलेले लोकजीवन याचेही प्रत्ययकारी दर्शन ही कादंबरी घडवते. लेखकाची ही पहिलीच कादंबरी असून त्याने तिच्या निर्मितीत लक्षणीय यश मिळवले आहे.
आयुष्याची स्वप्न शिवण्याचा प्रयत्न करणाऱ्या विठू च आयुष्य उसवत जाणारी कहाणी... तंत्रज्ञान आणि औद्योगीकरणाच्या रेट्यामुळे बारा बलुतेदारांचा व्यवसाय कशा पद्धतीने धुळीस मिळाला हे उसवण च्या मध्यामातून प्रतीकात्मक पद्धतीने देविदास सौदागर यांनी सांगितले आहे.