Yashwantrao Chavan an impressive & famous political figure in Indian politics and also an eminent scholar. Through this book share his memorable places he visited and his ideal & favourite personalities. E. g. Shivaji Maharaj, Pandit Nehru, Mahatma Gandhi, Dhananjayrao Gadgil, Kakasaheb Khadilkar etc.
● पुस्तक – ऋणानुबंध ● लेखक – यशवंतराव चव्हाण ● साहित्यप्रकार – व्यक्तिचित्रण, चरित्र, राजकीय ● पृष्ठसंख्या – २४८ ● प्रकाशक – रोहन प्रकाशन ● आवृत्ती – ०६ वी । प्रथम आवृत्ती -१९७९ ● समीक्षक – विक्रम चौधरी ● मूल्यांकन – ⭐⭐⭐⭐⭐
यशवंतराव चव्हाण.. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री.. काही माणसांची उंची इतकी उतुंग असते की प्रश्न पडावा इतकी उंची गाठण्यासाठी आपल्याला किती जन्म घ्यावे लागतील असा.. असेच कृष्णाकाठावर जन्मलेले, महाराष्ट्राचा मंगल कलश सह्याद्रीच्या वाऱ्याच्या वेगाने घेऊन येणारे, स्पष्ट भूमिका घेऊन सर्वांच्या सोबत ऋणानुबंध जपणारे, दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा; या भूमिकेला न्याय देणारे संवेदनशील नेतृत्व म्हणजेच यशवंतराव चव्हाण..!!
त्यांना भेटलेल्या व्यक्ती, भावलेली स्थळ आणि त्यांच्या मनावर कोरलेल्या घटनांचा हा आलेख..!!
प्रत्येक माणसाच्या जडणघडणीत त्यांना भेटलेल्या व्यक्ती, त्यांनी केलेला प्रवास, वाचलेली पुस्तके, जोडलेली नाती यांचा खूप मोठा वाटा असतो. ऋणानुबंध मध्ये यशवंतरावांनी याच सगळ्या घटकांची त्याच्या वैचारिक बांधणीमध्ये असलेला मौलिक योगदानाची पोच पावती दिली आहे. त्यांच्या बालपणापासून ते राजकीय जडणघडणीपर्यंतचा हा थक्क करणारा प्रवास आहे.. या पुस्तकात त्यांनी लिहिलेल्या लेखांमधून त्यांच्या राजकीय व्यक्तिमत्वाची वैचारिक व साहित्यिक बाजू उलगडत जाते.. शब्दांच्या सौंदर्यावर व सामर्थ्यावर नितांत विश्वास आणि प्रेम असणारे यशवंतराव कळतात ते या लेखांतून..
या लेखमालेची सुरवात होते ती ‛नियतीचा हात’ या त्यांच्या जीवनात योगायोगांनी घडून गेलेल्या घटनांपासून.. त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणाऱ्या प्रत्येक क्षणात त्यांना नियतीचा हात दिसतो ही प्रांजळ कबुली ते देतात. प्रत्येक मनुष्य स्वतःचे जीवन फक्त स्वतःच घडवत नसून त्यात त्यानी न्याहाळलेली काही तत्वे व भोवतालची सामाजिक परिस्थिती आणि वैचारिक संगतीचा तो परिपाक असतो असे यशवंतराव मानतात. वाचनाला आणि विचाराला अनुभवाचे कोंदण जेंव्हा लाभतं तेंव्हा अश्या अनुभवांमध्ये व्यक्तिमत्व परिवर्तनाची एक वेगळी ऊर्जा असते हे प्रत्येक लेखात यशवंतरावांनी सहजपणे अधोरेखित केले आहे..
हीच ऊर्जा त्यांना देशाच्या भवितव्याकडे पाहण्याची एक नवी आशावादी दृष्टी देत असावी..
सोनहीरा व केल्याने देशाटन ही माझी आवडती प्रकरणे. सोनहीरा नदीच्या काठी देवराष्ट्रात यशवंतरावांचा जन्म झाला. त्यांच्या आईच्या वाटेला आलेल्या दुःखाची व त्यांनी त्यांच्या मुलांवर केलेल्या संस्करांची उजळणी या लेखात यशवंतरावांनी केली आहे.
अश्या आशयाच्या ओव्या रचत आयुष्यभर त्यांच्या आईने सगळ्या संकटांचा सामना केला व ती वृत्ती मुलांमध्ये रुजवली.. आईच्या नसण्याबद्दल बोलताना यशवंतराव म्हणतात “ जेंव्हा तिच्या अस्थी सुटल्या, तेंव्हा भूतकाळाचा एकमेव धागा झटकन तुटला” असे त्यांना वाटले.. ज्यां आईच बोट धरून ते लहानपणी पंढरीला जायचे तेच बोट आता मोकळे आहे ह्या भावनेने त्यांचे मन गलबलते..
“सामान्य लोकनेता” व मराठी भाषिक राज्य - महाराष्ट्राच्या निर्मितीचे प्रमुख शिल्पकार अशी ओळख असलेल्या सामाजिक लोकशाहीचा पुरस्कार करण्याऱ्या यशवंतरावांच्या जीवनाचा हा आलेख प्रत्येक महाराष्ट्रीयन माणसाने वाचायला हवा..
सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक या साऱ्याच अंगांनी नव्या महाराष्ट्राची पायाभरणी होत असताना यशवंतरावांच्या ऋणानुबंधानी केलेला हा वैचारिक प्रवास नक्की वाचा..!!