कृष्णाचे चातुर्य आणि नीती जितकी युद्ध आणि राजकारणात प्रभावी होती, तितकाच तो स्त्रीमनाची घालमेल, शंका आणि वेदना किती विचारपूर्वक आणि लीलया हाताळू शकतो ह्याचे संवेदनशील संवाद. एक संवेदनशील पुरुष म्हणून कृष्ण कुंती(आत्या), द्रौपदी(बहीण) आणि राधा(प्रेयसी) यांच्याशी कसा भावनिक जोडलेला आहे, हे लेखिकेने शब्दबद्ध केले आहे, ह्यात रुक्मिणी, सत्यभामा आणि पांडवांचा संदर्भ हि येतो, विशेषकरून प्रत्येकीची समजूत घालताना, दुसऱ्या स्त्रीचे, नात्याचे दोरे तो सहज, परिणाम करतो जोडतो ते वाचणे कमालीचे आहे.
अरुणा ढेरे लिखीत ' कृष्णकिनारा ' ही कादंबरी मी मागच्या आठवड्यात वाचून पूर्ण केली. प्रस्तुत कादंबरीत स्त्री - पुरुषांमधील सर्जक आणि समर्थ नातं खूप सुंदर रित्या जागं केलेलं आहे. राधा, कुंती आणि द्रौपदी या प्रत्येकीबद्दल थोडं फार ज्ञान तर आपल्या सगळ्यांनाच आहे पण या कादंबरीतून त्या प्रत्येकीची ओळख खूप वेगळ्या दृष्टिकोनातून लेखिकेने करून दिली आहे. प्रत्येकीचं दुःख वेगळं पण तिघींची समजूत मात्र ह्या दुःखापेक्षा ही मोठी. राधा - कृष्ण यांच्या प्रेमाबद्दल फार कौतुक केलं जातं कारण ते खरंच जगावेगळं आहे असं आपण म्हणतो. कृष्णाने या प्रेमाचं रूपांतर कधीही लग्नात होऊ दिलं नाही, त्याचा व्यवहार होऊ दिला नाही. मात्र राधा आणि रुक्मिणी यांच्या व्यथा आणि राधा, कृष्ण आणि रुक्मिणी यांच्यातलं नातं, प्रेम, काळजी, समजूत किती समंजस होती याचेसुद्धा वर्णन कादंबरीत दिसून येते. कुंती- पाच पांडवांची आई. पण यातल्या प्रत्येकाचे वडील मात्र वेगळे. एकही पांडू पुत्र नसतो. असे असून देखील तिला तिच्या लग्नाआधी झालेल्या कर्णाला त्यागावं लागतं. माद्रीच्या मुलांना सुद्धा आपली मुलं समजून सांभाळणारी कुंती. पण आपल्या पहिल्या मुलावर झालेल्या अन्यायचं ओझं ती आयुष्यभर आपल्या खांद्यावर घेत वावरते. द्रौपदी - कृष्णाची बहीण, पाच पांडवांची बायको. सगळ्यांसोबत स्वतःला वाटून घेणारी. प्रत्येक पांडव तर नंतर सुद्धा वेगळं लग्नं करतो मात्र द्रौपदी शिवाय एकाचा ही जीव थाऱ्यावर नसतो.या प्रत्येकावर ती जीव ओतून प्रेम करते पण तिच्या नशिबी मात्र त्यांच्याच वाटे सोसणं येतं. या तिघींच्या आयुष्यातील शोकांतिका या कादंबरीत बघायला, अनुभवायला मिळतात. ' शेवटी काय; जी स्त्री हे सोसते, सहन करते तिलाच पूजलं जातं '. आज सुद्धा हीच स्थिती आहे. आज सुद्धा घरदार सांभाळून, नोकरी करून, आपल्यातल्या ' स्व ' ला त्यागून अनेक स्त्रियांना आपलं अस्तित्व निर्माण करावं लागतं. तर आणि तरच तिला ' ग्रेट ' म्हंटलं जातं. त्यामुळे ह्या तिघींच्या कथा वाचताना आपण सुद्धा त्यांचाच एक भाग असल्यासारखं वाटतं. आपण आजच्या स्त्रिया सुद्धा वाट्याला येईल ते चॅलेंज समजून त्याचा सामना करतो, थोड्या थबकतो पण त्या वर्तमानाला आपण आपलं सगळं काही देऊन टाकतो आणि काळाच्या दीर्घ, अवघड वाटेनं पुढे जातच राहतो.