Author writes of rural poor with some property, land, animals, homes, and problems they deal with - ... rain spoiling tobacco before its dry, a dairy animal that must be sold so children are deprived, old couples thrown out by sons, old woman worrying about the mangoes brought down by wind and rain, helplessness of a young wife sick and abused by old mother-in-law and kicked by her husband, .... and yet, he has a moment here or there, to look at heavens and wax poetic.
*****
निचरा
"तरणा जाऊन म्हातारा पाऊस काठी टेकीत आला होता. आभाळ भरून आलं होतं. गादीवाफ्यावरील तरवाला झारीनं पाणी ओतावं तशी पावसाची झिमझिम सारखी सुरू होती. जिरवणीचा पाऊस पडत होता.
"एकाएकी हवेत गारवा पसरला. हुडहुडी भरावी अशी गार हवा अंगाला झोंबू लागली. गारठा सोसेनासा झाला. तसे रानातल्या खोपीत एकटेच बसलेले रामजीकाका अंगावर एक घोंगडं घेऊन पायाला मिठी मारून बसले. किलकिल्या डोळ्यांनी उगाच बाहेर बघत राहिले.
"पाऊस थांबायचं काही चिन्ह दिसत नव्हतं. आभाळ जास्तच भरून येत होतं. पावसानं वंदाट घातलं होतं. बुरबुर सारखी सुरू होती. गळती काही थांबत नव्हती. आभाळच फाटल्यागत झालं होतं... आभाळ फाटलंच होतं..."
" ... ‘‘उसाची काय अप्रूबाई गाऽऽ! पर पोरगं असं रडाय लागलं आणि पोटात ढवळून या लागलं नव्हं. मग कोण म्हणालं, काळाबाळा ऊस दिला तर चालतं.’’
"‘‘व्हय. त्यो काय बादिकार न्हवं.’’
"‘‘ते झालं. पर त्यो ऊस पैदा करायचा कुटला? त्यो कुठं तरी कव्चित आढळणार आणि आपल्या येळेला गावणार कसा ऽऽ? मग म्हटलं हे काय न्हवं! आणि पडलो भाईर. दूम काढत काढत निघालो. पोटात ना अन्न ना पाणी. चार कोसांची वाट तुडवून झाली आणि मग त्या रुईचंदुरला त्यो बाळा ऊस भेटला! त्योबी एकानं हौसंनं लावल्याला. हितनं तिथनं चालून आल्यालं बघून त्याला बी अप्रूबाई वाटली. त्यानं भली एक मुळी बांधून डोक्यावर ठेवली. ती मुळी घेऊन मध्यान्राच्चं घरला आलो. तुझ्या सर्दीवरनं आज त्याची आठवण झाली बघ. अशी एकेक गोष्ट!’’"
*****
हिशेब
"एक घुटका गिळल्यागत बेलदारानं आवंढा गिळला आणि भोवतीभर नजर टाकून म्हणाला, ‘‘ह्या गावातल्या कुणा टग्यानं माझी बायकू काढून आणलीया. ती असली शाबूत तर परत मिळावी एवढी विच्छा हाय मालक.’’"
"‘‘आगा, पर आता तिचा काय तुला फायदा?’’
"‘‘त्याचं असं हाय सरकार. फायदा हायच की हो. हातावरची पोटं आमची. अहो, मी रोजी चार आणे मिळविलं तर ती तीन आणं तरी मिळवल का न्हाई? फायदा न्हाई कसं म्हणता?’’"
*****
कावळा
"पाच-दहा कावळ्यांचा एक कळप झडप येऊन खाली उतरला. गोरीपासून एक हातावर येऊन थांबला. लोकांच्या नजरा त्याच्यावर रोखून राहिल्या. टुक-टुक मान हलवत कावळे तिथंच बसून राहिले. दोन्ही पायावर पुढंमागं होऊ लागले. धीर करून एखादा कावळा पुढं जाई आणि पुन्हा उडून मागं येई. लोक श्वास रोखून बघत राहिले आणि खाली उतरलेले कावळे गोरीभोवती चकरा मारून वर उडून गेले. झाडावरचे कावळे कावकाव करून ओरडू लागले. चिमुकली काळी विमानं डोक्यावर तरंगू लागली. त्यांचे ताफेच्या ताफे खाली येऊन वर जाऊ लागले. झडप घेऊन वर येणारे कावळे गोरीला घसटून जाऊ लागले; पण पिंडाला धक्का लागेना झाला. पावसाळी ढग भरून यावेत तसं आकाश कावळ्यांनी भरून गेलं. कावकाव करून गिल्ला उडाला; पण कावळा शिवेना झाला."
*****
वावटळ
" ... पावसाची भुरभुर थांबली आणि मोरपंखी आकाशावर चांदण्याची खडी दिसू लागली. ... "
"‘‘काय सांगू पोरा! लगा लगा पांदीनं निघालो का? देसायाच्या रानापतुर गेलो बघ आणि वारा सुटला का? बदाबदा देसायाच्या झाडाचा आंबा पडताना दिसला, माझं काळीजच इदाळलं! पाऊलच फुडं पडेना झालं.’’
"‘‘आणि मग?’’
"‘‘तशीच फिरलो माघारी. म्हटलं आपल्या झाडाचा आंबा काय करतोय बघावं.’’ आणि डोळ्यांत पाणी आणून ती खाली बसली. गोळा करून ठेवलेल्या आंब्याच्या ढिगाकडं बघत म्हणाली, ‘‘बघ ही किती नासाडी झाली. वाऱ्यानं सारं झाड वरबडून काढलं रं पोरा. पोटात भडभडून या लागलंय माझ्या!’’"
*****
सोबत
"मघाशी घालवत गेलेल्या रस्त्याकडे तो पाठ फिरवून उभा राहिला आणि दुसरा रस्ता धरून पाय उचलू लागला!"
*****
वाटणी
"‘‘माझ्या घरची पायरी चढायचं कारण न्हाई. ज्या दिवशी तुम्ही मला सोडून गेला त्या दिवशीच तुम्ही मला मेला आणि मी तुम्हाला मेलो.’’
"प्रत्यक्ष पोटच्या पोराचे ते शब्द ऐकून म्हातारा हैराण झाला. छातीत भाला घुसल्यासारखं त्याला झालं. हातपाय मोडल्यागत होऊन तो तिथंच बसला. म्हातारा उभ्यानं कोलमडला तशी म्हातारी घाबरी झाली. त्याला सावरीत ती म्हणाली,
"‘‘तुम्ही असं घाबरू नका. माझं हातपाय अजून धड हैत. माझा जीवमान असुस्तवर तुम्ही का काळजी करता? मी तुम्हाला भाकरी करून घालीन. पोरास्नी जल्म देऊन आपुन चूक केलीया; मग काय करायचं?’’"
"शिवा उसळून म्हणाला, ‘‘अजून लई पाळी आणणार हाय देव तुम्हाला!’’
"‘‘तुझ्या तोंडात किडं पडलं!’’ असं म्हणून म्हातारी हात नाचवून म्हणाली,
"‘‘कुठल्या जन्मात पातक फेडशीला हे!’’ आणि भीमा परड्याच्या दारानं धावून येत म्हणाला,
"‘‘का नाचक्की कराय लागलाय आमची? तुम्हाला आपल्या पोरांजवळ ऱ्हायाचं नसेल तर स्वतंत्र ऱ्हावा. आमच्या नावानं गावभर डांगोरा पिटायचं कारण न्हाई. आमचं पटत न्हाई तर स्वत:च्या हातनं भाजीभाकरी करून खावी. तुम्हाला दाणं दिलं म्हंजे झालं न्हवं?’’
"‘‘व्हय बाबा, बरोबर हाय तुझं!’’ असं म्हणून म्हातारीनं डोळ्याला पदर लावला आणि म्हाताऱ्याला उठवत म्हणाली, ‘‘चला, आपली भाकरी आपुन करू आणि खाऊ.’’ भीमा माघारी फिरत म्हणाला, ‘‘हंगाशी! हे सगळ्यात उत्तम! त्याच्याही दारात जायला नको आणि माझ्याही दारात याला नको.’’
"‘‘खरं हाय बाबांनो!’’ असं म्हणून म्हातारा उठला आणि चालू लागला. त्याच्या हातांपायातलं अवसानच गेलं होतं आणि एक म्हणता त्याला दहा आठवत होतं."
*****
कोंडी
"तावातावानं तो भाऊ मलगोंडाच्या वाड्यात शिरला. जोत्यावर बसलेला भाऊ मलगोंडा हसून म्हणाला,
"‘‘का रामाभाऊ सुतार, का आलं?’’
"निर्लज्जासारखं त्यानं असं हसून विचारलं आणि अगडबंब दिसणाऱ्या त्या उघड्या देहाकडं बघून रामा हादरला.
*****
आभाळ
"‘‘कुठलं स्थळ म्हणायचं हे?’’
"‘‘नेलींचं गाऽऽ– आमच्या पावण्यापैतलंच हाय.’’
"हरीबाला आधार वाटला. तंबाखू विकली आणि हातात पैसे आले की बार उडवून टाकायचा विचार त्याच्या मनात घोळू लागला. त्यानं विचारलं,
"‘‘काका, मग कवा जाऊया नेलींला?’’
"‘‘तू म्हणशील तवा! कवा जाऊया सांग.’’
"हरीबानं विचार केला. कापलेली तंबाखू घरात आणायला अजून तीन उनं तरी पाहिजे होती. म्हणजे एक आठवडा ह्याच्यात जाणार. त्यानं सांगितलं,
"‘‘येत्या बेस्तरवारी रानातली तंबाकू तेवढी घरात आणून टाकतो. बोद भरून तेवढं जास्तानाला ठेवतो आणि मग कुनीबी एकांद्या दिवशी जाऊया.’’
"‘‘मंगळवार-बुधवारला जाऊया? म्हणजे मग तसा सांगावा धाडतो.’’
"हरीबा काहीच बोलला नाही, तसं काकानं पुन्हा विचारलं आणि त्याच्या तोंडाकडं बघितलं.
"हरीबा हातात चुन्याची डबी धरून तसाच बसून राहिला होता. डोळे आभाळाकडे लागले होते. वर बघतच तो म्हणाला,
"‘‘काका, ह्ये आभाळ काय करतंय कळत न्हाई. वरच्या अंगाला लक्क् केलं बघा.’’
"‘‘ईज होतीया काय रं?’’
:‘‘तसं काय तरी चिन्न दिसाय लागलंय. जातो आगुदर मळा तरी गाठतो.’’
"असं म्हणून हरीबा गडबडीनं उठला आणि पान खायचं विसरून तसाच पुढं निघाला. वर बघत खाली बघत त्यानं मळा गाठला.
*****
अर्धली
"‘‘अण्णा, तोंडचा घास काढून घेता व्हय असा?’’ बसलेला बाकेराव उठून उभा राहिला आणि हातवारे करून म्हणाला, ‘‘तुमच्या तोंडचा घास काढून घ्यायला मी काय म्हस माझ्या दावणीला बांधत न्हाई. जशी तुम्हाला म्हशीची गरज हाय तशीच मला बी पैशाची गरज हाय. दोन्हीकडं इचार कराय पायजे. तुम्ही म्हस अर्धलीनं पाळली ह्याबद्दल निम्मं पैसं तुम्हाला मिळत्यातच की! काय फुकटाफाकट म्हस कोण न्हेतोय का?’’
"पदराच्या शेवटानं डोळे पुसत ती म्हणाली,
"‘‘निम्मं पैसं घेऊन काय जाळायचं हैत? काय पैशाची धार काढाय येतीया त्या?’’
"‘‘अहो मग दुभतं खायचं असंल तर टाका की निम्मी किम्मत! कुणी नको म्हटलंय तुम्हाला? मी म्हस पायजे म्हणतो का!’’
"‘‘ते काय न्हाई खरं.’’
‘‘मग झालं तर,’’ असं म्हणून बाहेर पडताना तो बजावून म्हणाला, ‘‘एक गोष्ट धांदा बोलायला मी काय हेडी न्हाई. माझा शबूद एकदा गेला की गेला. येत्या शनवारपातूर पैशाची वाट बघणार; न्हाई तर सरळ दिस उगवायला हेड्याला घेऊन दारात येणार ते दावं सोडून म्हशीला बाजाराला न्हेणार! मग काय का किंमत येईना. मी म्हस इकून मोकळा होणार बघा. धुळजीला सांगून ठेवा. निघतो मी.’’"
*****
जीत
"तुकानं आपला म्हातारा हर्ण्या बैल गाडीला जोडला होता. जोडीच्या तरण्या खिलारी खोंडाबरोबर हर्ण्या उभा होता आणि लोक टक लावून त्याच्याकडंच बघत राहिले होते. आपल्या ऐन उमेदीत हर्ण्यानं शर्यती जिंकल्या होत्या, हे लोकांना माहीत होतं. त्याचे गुण सगळ्यांना माहीत होते. साऱ्या गावात तो नावाजलेला बैल होता हे खरं; पण आता त्याचं वय झालं होतं. अंगात दम नव्हता. अंगावर धड मांस नव्हतं. त्याची हाडं दिसत होती. बैल पार थकला होता आणि तोंडावर राव नव्हता. जोडीच्या खिलारी खोडाबरोबर तो कसा पळणार, हीच चिंता लोकांना पडली होती आणि लोक सारे मनातनं तुका पाटलाला शिव्या देत उभे होते. त्या खुळ्यानं म्हाताऱ्या बैलाला का जोडावं, हेच त्यांना कळत नव्हतं.
"हळूहळू सगळ्या गाड्या येऊन उभ्या राहिल्या. कुणाची जोडी राहिल्या जागी नाचत होती. कुणाचे अंडील खोंड डिरक्या फोडत होते. कुणी गर्दन वाकवून शिंग हलवत होतं तर कुणी पायानं खालची जमीन उकरत होतं. हर्ण्याचा जोडीदारही गप उभा राहत नव्हता; पण लोक सारे हर्ण्याकडेच बघत उभे होते. हर्ण्याचं पळणं त्यांना ठाऊक होतं. त्याची चलाखी साऱ्यांना माहिती होती. उभ्या गाडीला तो कधी थयथय नाचायचा नाही. डिस्की टाकायचा नाही. शिंग हलवायचा नाही; पण एकदा गाड्या सुटल्या आणि चाकं खडाडली म्हणजे त्याचा पाय जमिनीवर ठरत नसे! चाकं वाजतील तसा तो उशी घेत जायचा. त्याला कधी उसकाव लागायचं नाही– मारावं लागायचं नाही. तशीच वेळ आली तर जोडीच्या बैलालाही गुंडाळून घेऊन तो एकटाच धावायचा!
"हर्ण्या असा धावायचा हे खरं; पण आता त्याचं वय झालं होतं. बाजाराला– जत्रेला जाताना एखादी चुणूक दाखविणं निराळं आणि रौंडाचं काम निराळं. हे काम आता कसं काय झेपणार ही चिंता लोकांना लागली होती आणि तुका निश्चिंत होता. हर्ण्या म्हातारा झाला असला तरी त्याच्यावरच त्याचा भरवसा होता. लोक काळजीनं त्याच्या गाडीकडं बघत होते आणि तुका खुशाल हसऱ्या चेहऱ्याने त्यांच्याकडं बघत होता.
"इशारा झाला. गाड्या उधळल्या. चाकं खडाडली. हर्ण्याच्या कानात वारं शिरलं आणि कळा खाणारा म्हातारा बैल उमद्या घोड्यागत लांबलचक उडी घेऊ लागला. त्याचा पाय जमिनीला ठरेना झाला. जोडीच्या खिलारी खोंडाचा सोगा मागे पडू लागला. बघता बघता गाड्यामधून गाड्या तोडल्या जाऊ लागल्या. एक वावटळ सुटल्यागत गाडी पुढं जाऊ लागली. बाकीचे गाडीवान पालथे पडून बैलांना हाणू लागले आणि सारे लोक खुळे होऊन बघत राहिले."
*****
वंगण
"तिच्या तोंडातनं धड शब्द निघत नव्हता. ती कष्टानं म्हणाली,
"‘‘का मारता मला?’’
"‘‘अजून कुठं मारलंय तुला! भाद्दरने! अजून लई मार खायची हायस तू!’’
"असं म्हणून तो चवताळून अंगावर जाऊ लागला. म्हातारा त्याला मागं ओढू लागला आणि पोरगं दात खाऊन म्हणू लागलं,
"‘‘आबा, हा संसार फुरं.’’
"म्हातारा त्याला मागं ओढत म्हणू लागला,
"‘‘पोरा, काय खुळेपना ह्यो?’’
"आणि त्याच्या हातातनं सुटून पुन्हा बायकोच्या अंगावर जात पाक्कन एक लाथ घालून तो म्हणाला,
"‘‘ह्यो शानपना बगा!’’
"त्या दणक्यासरशी कळ अनावर होऊन तिनं तोंडावर हात घेतला आणि सासू सोप्यातनं उठून आत येत म्हणाली,
"‘‘बाबा, पोरा, माझं आन तुझ्या बायकूचं काय पटायचं न्हाई.’’"
*****
पानगळ
Author seems to collect all known lullabies, songs and stories told children, until he ends it in a grieving couple's inability to deal with it.
"दुपारच्या उन्हाने तगमग होऊ लागली, शिशिरातल्या थंडीने अंगात हिंव भरू लागले आणि वर्षा ऋतूतले ढग गोळा होऊन काजळी धरलेले आकाश उपडे होऊन गळू लागले... पावसाची रिमझिम सुरू झाली, झाडे निथळू लागली आणि त्यांची पानेही गळू लागली..."
*****
वाटचाल
"दिवस उगवून वर आला. दाट धुकं पातळ झालं. आजूबाजूची झाडी दिसू लागली. कोवळ्या उन्हात हिरवी रेशीम चमकू लागली. जागजागी तंबू ठोकल्यागत डोंगरमाथे दिसू लागले. लांबून दिसणारे डोंगरांचे सुळके देवळाच्या कळसागत तळपू लागले. पायाखालची नागमोडी वाट चिंचोळी होऊन वाकडी-तिकडी पळू लागली. डोंगराच्या कमरेला विळखा घालून गोल फिरू लागली. भोवऱ्यागत स्वत:भोवतीच वेढे घेत राहिली. ती अशी वेढे घेऊ लागली आणि भोवतालचे डोंगरमाथेही फिरू लागले. झाडंझुडपंही फिरू लागली, वाट वर चढू लागली; खाली उतरू लागली. झोका वर जाऊ लागला, खाली येऊ लागला. पाण्यात हेलावणाऱ्या नावेगत सूर्य वरखाली होऊ लागला; कोणी तरी वरून दाबल्यागत दडीमारून खाली जाऊ लागला; उसळी मारून वर येऊ लागला. लहान पोरागत लपंडाव खेळू लागला. डोंगराआड लपू लागला; मान बाजूला करून हळूच डोकावू लागला. निळ्या काचेतून पिवळं ऊन खाली उतरू लागलं. जिकडं तिकडं टवटवीत दिसू लागलं. रात्रीतून फुललेल्या मोगऱ्याच्या झाडागत सृष्टी तरारल्यागत दिसू लागली. दिवस उगवला. सकाळ झाली आणि हातांपायांत हुरूप आला. ... "
"कोवळं ऊन तिरकं झालं. डोळ्यांत घुसून चमकू लागलं. उन्हाचा सरडा रंग बदलू लागला. पिवळं-सोनेरी ऊन निळं दिसू लागलं. निळं ऊन हिरवं-पोपटी होऊ लागलं. ऐना लकाकू लागला. तेरड्याची फुलं उमलू लागली. इंद्रधनुष्य डोळ्यापुढं पेटू लागले; विझू लागले. रंगांत रंग मिसळू लागले... दौत उपडी होऊन अंगावर सांडू लागली..."
*****
*****