‘‘‘दशक्रिया’ ही भानुदास नावाच्या एका शाळकरी मुलाच्या आयुष्याची कहाणी आहे. बुद्धी, चातुर्य व साहस पणाला लावून पोटाची खळगी भरू पाहणार्या, दारिद्य्राने ढासळून गेलेल्या आपल्या कुटुंबाला आधार देण्याचे स्वप्न पाहणार्या भानुदासची ही कहाणी हळूहळू विस्तारत जाते आणि रोगट रूढींमुळे धर्माला आलेली अवकळा, विदारक जातिव्यवस्था, अर्थार्जनाचे एकाच वेळी संतापजनक व करुणाजनक वाटणारे पर्याय, पार कोलमडलेली कुटुंबव्यवस्था, उच्च-नीच अशा अनेक वर्णांना व वर्गांना पोटासाठी एकाच पातळीवर आणणारी विचित्र समाजस्थिती, आधुनिकीकरणाकडे पाठ फिरवणारे समूह, मानवी नात्यांचे पैशांमुळे पटापट बदलत जाणारे रंग, मृत्यू आणि धर्माबाबतचे चिंतन, सोनेरी इतिहासाचे सडलेले कातडे अंगावर ओढून सुस्त पडलेली
अंत्येष्टी विधींवर चरितार्थ चालवणाऱ्या माणसांची ही गोष्ट आहे.त्यामुळं ती वाचताना पुस्तकभर काही अप्रिय वर्णनं असणार हे ओघानंच आलं.तरीही यातील ताकदीच्या व्यक्तिरेखांत,त्यांच्या आयुष्यात,आपण नकळत गुंतुन जातो…
नकोशा वाटणाऱ्या मरणा-सरणाच्या या संवेदनशील विषयाबद्दल असलेला आपला पुर्वग्रह यातील वास्तव समजुन घेताना पुर्ण बदलतो.प्रथमतःयाविषयी असलेली भीतीची भावना मग आपसुकच कणव आणि विस्मयात बदलत जाते.
असं असेल म्हणून कदाचित,
या पुस्तकावर लिहिताना मला इथं कथेपेक्षा त्यातील पात्रांबद्दल बोलणं अधिक संयुक्तिक वाटतं.
गोदातटीचं पैठण हे तीर्थक्षेत्र तसंच अंत्यकर्म,श्राद्धादी विधींचं केंद्र.९० च्या दशकातील पैठणच्या गल्लीबोळांची,घरांची,रहिवाशांची बैजवार ओळख करुन देत कथेला सुरुवात होते.
शाळकरी भानुदासची ही कथा त्याच्या आयुष्यात एकामागून एक येणाऱ्या पात्रांच्या ओळखीतुन पुढे सरकत जाते.शाळा चुकवुन घाटाकडे, अंत्यविधीसाठी आलेलं गिऱ्हाईक मिळवणाऱ्या भानुदासला “शाळेत शुद्धलेखन किंवा अवघड गणितं सोडवण्यापेक्षा प्रेताची राख चाळणीतुन गाळताना मिळणारा आनंद कणभर जास्तच वाटतो.”
शिकण्यात वेळ घालवण्यापेक्षा,गरिबीत पिचलेल्या आईबाप,भावंडांना मदत करण्यासाठी तो धडपडतो.मढ्याच्या राखेतुन मिळणाऱ्या सोन्या-नाण्यात तो अधिक रमतो.भले मग ते काम इतरांना हीन दर्जाचं वाटत असेल.त्यासाठी,आईचा रोष पत्करायलाही तो तयार असतो.
भानुदास या कथेचा नायक आहे.तो व्यावहारिक व स्वतंत्र विचारांचा आहे.गरीबीपुढे तो हतबल नाही,पडेल ते काम करुन,चार पैसे कमवुन स्वतःच्या पायावर उभं राहायचा सतत प्रयत्न करताना तो दिसतो.
त्याची आई-शांताचा कुटुंबाची जबाबदारी पेलताना करावा लागणारा संघर्षही कथेत ठळक जाणवतो.हातावर पोट घेऊन जगताना आलेल्या अनेक अडचणींना ती खंबीरपणे सामोरी जाते.दुसरीच्या नादी लागुन दारुपायी वाया गेलेला व नंतर अपघातानं अपंग झालेला आपला नवरा- विठ्ठलने तिला त्यावेळी दिलेल्या वागणुकीविषयी कितीही कटुता असली तरी त्याला सांभाळण्यात ती कुचराई करत नाही.स्वतःच्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी ती आशावादी आहे.
विठ्ठल,त्याचं मागाहुन आलेलं पंगुत्व,परावलंबित्व,त्यामुळं हरवलेला आत्मविश्वास अशा अवस्थेतही बायकोला संसारात मदत करण्याची परोपरी धडपड करताना दिसतो.याचबरोबर त्याच्या मनात भूतकाळात झालेल्या चुकांबद्दलची अपराधीपणाची भावनाही आहे.
चालु कथेत अचानक डोकावणाऱ्या ‘शकु’चं प्रयोजन मात्र थेट पुस्तकाच्या शेवटीच कळतं.
भानुदास सोबतच त्याच्या अवतीभवती वावरणाऱ्या एकेका व्यक्तिरेखेशी आपली ओळख होत जाते.एकेकाळी वैभव उपभोगलेल्या ‘पत्रे’ सावकाराची अवस्था त्याच्या रया गेलेल्या वाड्यासारखी म्हणजे “ज्या हातांनी पैठणच्या अडल्या-नडल्यांना पैसे वाटले ते हात प्रेताची राख चाळणाऱ्या चाळणी इतरांना भाड्याने देऊ लागले.”दोन वेळची भ्रांत पडावी इतकी ती बिकट झाली आहे.
याशिवाय,इतर पात्रांमधे “सावकाराच्या शुभकार्यात सर्वांच्या रांगेत बसायची तुम्हा किरवंताची एवढी हिंमत?”अशी अवहेलना केली म्हणून सावकाराचा राग-राग करणारे केशवभटजी, बायकोनं फसवल्यानं संसार सोडुन संन्यासी झालेला,मयतासाठी लाकडं पुरवणारा,‘महाराज’काशिनाथ, क्षौरकर्म करणारा तुकाराम, मयताचं इतर सामान पुरवणारा सदाशिव अशी बरीच माणसं,अनेक दुखऱ्या कोपऱ्यांसह,पैठणच्या तीर्थक्षेत्रात अंत्यविधीं करुन आपली आयुष्यं सावरताना आपल्याला दिसतात.
या सर्वांना जोडणारं एकच सुत असतं,ते म्हणजे“दशक्रिया”.
एकुणातच काय तर,खोटी प्रतिष्ठा मिरवणारा मैंद समाज,बदलत्या जाणिवा व आव्हानांसमोर कोलमडु पाहणारी विषम व्यवस्था,नीतीमुल्यं,गतानुगतिक कर्मकांडांत अडकुन पडलेली मनं,पैशापायी बदलत जाणारी नाती,ताणलेले नातेसंबंध या साऱ्या गोष्टीं ‘दशक्रिया’त जागोजागी दिसतात.
एखादी पार्श्वभुमी विशद करताना काही वेळा झालेली वर्णनांची पुनरावृत्ती,तपशीलवार मांडणी अनाठायी वाटली तरी नेमके संवाद,बोलीभाषेतील संभाषणं, स्पष्ट व प्रसंगानुरुप पात्रनिर्मिती कथेचा परिणाम कायम ठेवण्यास हातभार लावतात.
कादंबरीतुन बऱ्याचदा आढळणारा कल्पनाविलास टाळून कथावस्तु अधिकाधिक वास्तवदर्शी करण्याच्या अनेक प्रयत्नांपैकी दशक्रिया एक प्रामाणिक व यशस्वी प्रयत्न आहे,असं मला वाटतं.