नरहर कुरुंदकर हे महाराष्ट्राला लाभलेल्या आधुनिक विचारवंतांपैकी एक आहेत. वस्तुनिष्ठ, परिणामकारक विचारांसाठी ज्यांच्याकडे पाहावं असं हे व्यक्तिमत्व आहे. आज जेंव्हा प्रत्येक लिखाण हे कुठल्यातरी हेतूने प्रेरित असल्याचे आरोप सर्रास होत असतात, तेंव्हा निव्वळ वैचारिक आणि अकादमीक हेतूने, चिकित्सक प्रेरणेने लिहिलेले त्यांचे सर्व लेख परत परत वाचनीय, मननीय ठरतात.
व्यासांचे शिल्प हा लेखसंग्रह आहे. पुण्याच्या इंद्राणी प्रकाशनाने ही आवृत्ती कुरुंदकरांचे बरेचसे लेख संकलित करून काढलेली आहे. इरावती कर्व्यांच्या युगांत किंवा दुर्गा भागवतांच्या व्यासपर्व सारखे सर्व लेख व्यक्तिकेंद्रित नाहीत. अखेरच्या एक दोन लेखांमध्ये या दोन्ही विदुषींच्या लेखनाबद्दलची कुरुंदकरांची मते विस्ताराने येतात. मात्र इतर लेख महाभारत ह्या ग्रंथराजाबद्दल आहेत. भांडारकर संस्थेने अतिशय विद्वत्तापूर्ण पद्धतीने, कष्टाने सिद्ध केलेल्या चिकित्सक प्रतीचेही संदर्भ ठिकठिकाणी येतात.
महाभारताबद्दल अनेक प्रभृतींनी सविस्तर लिखाण केले आहे. मुक्तेश्वर आणि मोरोपंत ह्यांच्या दीर्घकाव्यांपासून, टिळकांच्या गीतारहस्यापर्यंत अनेकांना ह्या ग्रंथाने भुरळ घातली आहे. कुरुंदकर ह्यातल्या अनेकांच्या अभ्यासपूर्ण लेखनावर आपली टिपणे देतात. अनेक ठिकाणी मूळ लेखकाची मते मान्य नसून त्या त्या लेखकांच्या परिश्रमाबद्धल आदरभाव व्यक्त करून ते त्यांचे मतभेद नोंदवतात. रामायणाबद्दल आणि गीतेबद्दलचे त्यांचे विचार परखड आहेत. प्रबंधांवरचे टीकात्मक लेख फारसे वाचनात येत नाहीत, मात्र या पुस्तकांतील लेखांमुळे बऱ्याच महाभारतावरील लिखाणाची ओळख होते. निव्वळ 'निवडितो ते सत्व आम्ही निके' ह्या शुद्ध हेतूने इतर लेखनाकडे आणि महाभारताकडे पाहण्याचा दृष्टिकोन हे पुस्तक देते.
महाभारतातला सद्यस्थितीत एक धार्मिक रंग आलेला आहे. सर्वांत पुरातन महाकाव्य आणि इतिहास म्हणून महाभारताची ओळख आहेच पण त्यात आताशा प्रचंड सांस्कृतिक अभिमान कालावल्यामुळे, आणि त्यातील काही व्यक्तिरेखांना देवत्व बहाल झाल्याने, वस्तुनिष्ठ पद्धतीने, इतिहास म्हणून पाहताना अनेक अडचणी येतात. ह्या पुस्तकातले लेख अनेक अंशी ह्या अडचणी दूर करतात आणि महाभारताकडे इतिहास आणि कलाकृती अश्या दोन वेगळ्या परिप्रेक्षात पूर्णपणे भिन्न रीतीने पाहण्यात मदत करतात.
त्यांच्या लेखनशैलीविषयी नक्कीच एक वेगळा लेख लिहिता येईल. एखाद्या व्यक्तीच्या लिखाणाबद्दल लिहिताना, ती व्यक्ती आणि लिखाण ह्या दोन्हीचा संपूर्णपणे वेगळा विचार करण्याची क्षमता त्या पिढीतल्या अनेकांकडे होती. आज आजूबाजूला पाहताना, कोण कुठल्या 'कळपात' आहे ह्यावरून त्या व्यक्तीच्या मतांना सहजगत्या विलक्षण पूर्वग्रह लावले जातात. अश्या वेळी कुरुंदकरांचं लेखन प्रचंड समाधान देऊन जातं. कुठल्याही लिखाणावर आपलं मत देताना ते संपूर्णपणे लिखाणाबद्दलच कसं राहील ह्याचा वस्तुपाठ कुरुंदकरांच्या लेखणीतून जाणवतो. त्यांच्यापेक्षा वडील असलेल्या व्यक्तींच्या लिखाणाला त्यांनी आदरापोटी उगीच झुकतं माप दिलं नाही, मात्र लेखकाबद्दलचा आदर तितकाच सहजतेने व्यक्तही केला. अजिबात न पटणाऱ्या लेखकांशी पण कधीही पातळी सोडून टीका केल्याचे दिसत नाही. विचारांच्या लढाया ह्या विचारांनीच आणि पुराव्यांनीच लढल्या पाहिजेत, व्यक्तींत त्यामुळे वितुष्ट आले नाही हे त्यांचे आणि त्यांच्या समकालिनांचे यश.
प्रत्येकाच्या संग्रही असावं आणि वारंवार वाचनात येत राहावं अशीच कुरुंदकरांची पुस्तके असतात, हे सुद्धा त्याला अपवाद नाही.